Name:
Location: Solapur, Maharashtra, India

Thursday, May 18, 2006

मी एम.एस्सी.ला असताना एका वर्गमित्राकडून ही म्हण मी ऐकली होती. आजकाल असं वाटतंय की जिकडं बघावं तिकडं हीच परिस्थिती आहे. जिकडेतिकडे वेडे ठासून भरले आहेत आणि आभाळातून मुसळधार पेढे पडताहेत.
हा विचार मनात येण्याचं प्रासंगिक कारण म्हणजे टी.व्ही. वरच्या बातम्या. एक नाही, दोन नाही..... जवळजवळ वीस-पंचवीस वाहिन्यांवरून सतत बातम्या गिरणीतून पडणा-या पिठासारख्या सांडत असतात. एखादी घटना घडली रे घडली की तिची बातमी होते. शेजारच्या काकूंना नातू झाल्याचंही आधी टीव्हीवर कळतं. पलीकडच्या गल्लीतली गटार फुटली रे फुटली की तिथं एक बातमीदार हजर. डोकं भंडावून जातं. कळत नाही की ह्या प्रसार माध्यमांना इतके वार्ताहर मिळतात कुठून? आणि आजकाल त्यात "स्टिंग ऑपरेशन"ची भर पडलेली आहे. तळमजल्यावरच्या प्रशांतला त्याच्या आईवडिलांनी काल चक्क टीव्हीवर पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला. कॉलेजच्या मुलांना सिगारेटच्या व्यसनानं कसं वेड लावलं आहे ते एका चॅनलवर दाखवलं जात होतं. प्रशांतच्या कॉलेजजवळच्या पानपट्टीचं चित्रीकरण एका मारुती कारमध्ये लपून घेण्यात आलं होतं. ही घडली घटना आणि ही घ्या बातमी असं काहीसं होऊन बसलंय. बरं नुसतं बातमी द्यायचं राहूद्या बाजूला, बातमी चटपटीत कशी होईल आणि प्रेक्षकांच कुतुहूल कसं वाढेल ह्याकडे हे बातम्यांचे चॅनल्स खास लक्ष देतात. प्रत्येकाला एकच सांगायचं असतं.... "आम्हीच ही बातमी सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोचवली". अरे काय मग.... थोडा उशीर झाला असता तर काय तुला जाब विचारायला येणार होतो की काय आम्ही? आणि झालाच असता जरासा उशीर तर निदान व्यवस्थित बातमी तरी आणली असतीस की! उदाहरणार्थ आपले अर्थमंत्री समजा म्हणाले की विकासाचा दर ८ टक्क्यांपर्यंत गेला पाहिजे की लागले हे आपली खिचडी शिजवायला..... ते असं का बोलले? असं कसं बोलले? कधी बोलले? कोण कोण होतं त्यांच्या सोबत? विकासाचा दर ह्याचा अर्थ काय असतो? त्याची उत्पत्ती कशी झाली? औरंगजेबाच्या काळात विकासाचा दर किती होता? आता ह्याचे परिणाम काय होणार? सामान्य माणसाची काय अवस्था होणार?...... अरे आवरा जरा. जणू काही आज एक आंदोलनच उभं करताय. पण उद्या आणखी कोणीतरी काही बोललं की आज जे काही सांगत आहात ते हवेत विरून जातं आणि पुन्हा तुमचं "नवा गडी नवा डाव" सुरू होतं. पत्त्यांचे बंगले बनवणं हा ह्यांचा रोजचाच धंदा आहे.
काही दिवसांपूर्वी एक घटना घडली.... दाऊद इब्राहीमच्या मुलीचं लग्न जावेद मियॉंदादच्या मुलासोबत दुबईतल्या एका हॉटेलात झालं...... झालं म्हणजे.... झालं!!... एक गुळाचा खडा दुबईत सापडला, आणि लागलीच गर्दी झाली मुंगळ्यांची. एका चॅनलवरती मी पाहिलं... म्हणत होते.... जगभरातली प्रसार माध्यमं इथं गोळा झाली आहेत, पण फक्त आमच्याच चॅनलला आत जाण्याची परवानगी मिळाली.... (खास डॉनकडून!!!!) मी चॅनल बदललं.... आणि चक्क ह्या चॅनलवरही हे तेच सांगितलं जात होतं. पुन्हा पुढच्या चॅनलवर गेलो.... हे महाराज तर म्हणत होते...."आत्ता आतूनच येतोय (रसमलाई एकदम छान झाली आहे... वा).... मला एकट्यालाच बोलावलं होतं.... (मागे डॉनबद्दल एक विशेष कार्यक्रम दाखवला होता ना.... त्याची आठवण करून देत होते)!!" अरे काय ताळतंत्र आहे की नाही? कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही.
प्रमोद महाजन हिंदुजा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते तेव्हा मात्र कहर केला ह्या लोकांनी. प्रवीण महाजन त्यांच्या घरात कसा शिरला त्यापासून ते प्रमोद कसे कोसळले इथपर्यंत सर्व गोष्टींचे ऍनिमेशन करून दाखवले जात होते. जणू काही प्रवीण ह्यांच्याकडे आधी आला होता आणि म्हणाला होता...." चला माझ्याला भावाला गोळ्या घालू". रोज महाजनांच्या शरीराचा आडवा छेद (Tranverse Section) दाखवून यकृत, स्वादुपिंड आणि आतडी कुठे असतात ह्याचा क्लास घेतला जात होता. एक वार्ताहर कॉन्फरन्स कॉलवरून एका डॉक्टरसोबत निवेदिकेबरोबर चर्चा करत होता आणि डॉक्टरसाहेबांना विनंती करत होता की... "साहेब... तुम्ही तुमच्या पोटावरून हात फिरवून सांगा की पॅन्क्रियाज (Pancreas = स्वादुपिंड) कुठे असतं आणि महाजनांना कुठेकुठे गोळ्या लागल्या आहेत?" आणि ते डॉक्टरही लगेच आपल्या पोटावर हात फिरवू लागले आणि कॅमेराही त्यांच्या पोटावरून फिरू लागला. हे सगळं पाहून हसावं की रडावं तेच कळेना. तीच कथा सचिन तेंडुलकरच्या दुखापतीची आणि अमिताभ बच्चनच्या आतड्यांची. सरसकट सगळ्या वाहिन्यांवर त्यांची ऑपरेशन्स केली गेली.
मी दहावी आणि बारावीला असतानाचं आठवतं, टीव्ही पाहण्यावर घरात बंदी होती. टीव्ही फक्त रात्री साडेआठ वाजता लागायचा..... राष्ट्रीय समाचार पाहण्यासाठी. वर्षानुवर्षे जे.व्ही.रमण, मंजिरी जोशी, सलमा सुल्तान, किंवा वेदप्रकाश हेच बातम्या सांगायचे. एक तासभर बातम्या प्रसारित होत असत..... अर्धा तास हिंदीतून आणि अर्धा तास इंग्रजीतून. "खबरें अभी और भी हैं..... देखते रहिये".... असला प्रकार तेव्हा नव्हता. ब्रेकिंग न्यूज म्हणून सारखी सारखी टीव्हीची काच फोडली जात नव्हती. हातातली कागदपत्रे वाचून तो निवेदक मोकळा होत असे. आयुष्यभरात एक अर्धशतकही न ठोकू शकलेले क्रिकेटपटू हातात बॅट धरून काल्पनिक (virtual) खेळपट्टीवर विक्रमी खेळखंडोबा करत नव्हते. आठवडाभर अंघोळ न केलेला "झिप-या समंध" रात्री अकरा वाजता "सनसनी" (सन ऑफ शनी) नावाचा गोंधळ घालत नव्हता. बंगाली बाबांच्या आणि भुरट्या चोरांच्या मागे धावणारा "क्राईम रिपोर्टर" तेव्हा नसायचा.
शेवटी कालाय तस्मै नमः
कालानुपरत्वे वाढत जाणारी स्पर्धा आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केला जाणारा केविलवाणा आटापिटा ह्यातून उगवलेले तण म्हणजे असले एकाहून एक मूर्खशिरोमणी. मिर्जा गालिब जसे म्हणतो....
"बेवकूफोंकी कमी नही है गालिब,
एक ढूंढो, हजार मिल जायेंगे".

त्यालाच आपण आपल्या ग्रामीण 'श्टाईलीत' म्हणतो.....

"येड्यांच्या बाजारात पेड्यांचा पाऊस".

4 Comments:

Blogger Nandan said...

chhan. lekh aavaDala.

11:18 AM  
Blogger शैलेश श. खांडेकर said...

नंदनशी सहमत.

8:07 PM  
Blogger Diksha Neel said...

cool blog!

4:33 PM  
Blogger nikone said...

damn good! keep writing the same way

9:01 PM  

Post a Comment

<< Home