Name:
Location: Solapur, Maharashtra, India

Friday, May 19, 2006

पुन्हा येड्यांच्या बाजारात.....

बातम्यांसारखीच कथा इतरांची.....
१९८८ सालची गोष्ट.... रविवारचा दिवस होता. तसं आमचा रविवार म्हणजे पूर्णपणे क्रिकेटच्या चरणी वाहिलेला असायचा, पण हा रविवार काहीसा वेगळा होता. त्या दिवशी आमच्या घरी स्वतःचा टीव्ही येणार होता (स्वतःचा मुद्दाम म्हटलं..... कारण त्या काळापर्यंत टीव्ही म्हणजे शेजारच्या शेठजींच्या घरातला किमती ऐवज होता). सकाळी दुकानात गेलेले वडील दुपारी दोनच्या आसपास टीव्ही घेउन आले. त्यांच्या सोबत आलेल्या टेक्निशियननं आधी ऍन्टेनाच्या काड्या पट्टीवर स्क्रूने आवळून लोखंडाच्या दांडीवर बसवल्या आणि ऍन्टेना गच्चीवर घेऊन गेला. खाली त्याने आम्हाला ऍन्टेनाची तार टीव्हीला लावून दिली होती आणि म्हणाला, "मी वर जाऊन ऍडजस्ट करतो, काही दिसलं तर मला ओरडून सांगा". मग तो ऍन्टेना इकडेतिकडे फिरवत दूरदर्शन केंद्राच्या टॉवरच्या दिशेला त्याने वळवला आणि..... होSSSS!!!..... टीव्हीवरचं मुंग्यांचं वारूळ शांत झालं. पहिलंवहिलं दृश्य आम्ही आमच्या टीव्हीवर पाहिलं......

"सात रंगांच्या उभ्या पट्ट्या" आणि त्यासोबत "कूंSSS" असा शिट्टीसदृश आवाज.

खालनं कुणीतरी आरोळी ठोकली.... " आलं रेSSSS आलं, दिसलं.... दिसलं!!!!" टेक्निशियन खाली आला. त्याने घड्याळाकडे पाहिलं. तीन वाजले होते. कार्यक्रम चार वाजता चालू होतील एवढं सांगून तो निघून गेला. मग चार वाजेपर्यंत त्या व्हिडिओकॉनच्या कृष्णधवल पोर्टेबल टीव्हीला हळदकुंकू, हार, साखरेचा खडा आणि नारळ अर्पण झालं. कोणीतरी ओरडलं.... "बंद करा रे.... ऐकू येत नाही का? किती ' कूंSSS कूंSSS' करतंय. टीव्ही खराब होतो जास्त आवाज झाल्यामुळे".
शेवटी कानाखाली खाडकन वाजवून दिल्याप्रमाणे तो सप्तरंगी पडदा फट्कन बाजूला झाला आणि दूरदर्शनचा ग्रहगोल गिरक्या मारू लागला. शेवटी "सत्यम शिवम सुंदरम" असा संदेश देत कार्यक्रम चालू झाला. सर्वात पहिल्यांदा दूरदर्शनचे घडयाळ घटका मोजू लागले आणि घटका पूर्ण होतात न होतात तोच आणखीन एकदा कोणीतरी त्याच्या कानाखाली ठेवून दिली आणि समोर एक पाटी आली..... तिच्यावर लिहिलं होतं....

"रूकावट के लिये खेद है."

हा आमच्या घरातला टीव्हीवरचा पहिलावहिला कार्यक्रम.....!!!!!

त्यालासुद्धा कोणीतरी एक कारणमीमांसा सांगितली..... "ते दिल्लीच्या दूरदर्शन केंद्रातले लोक चहा प्यायला गेले असतील... चार वाजलेत ना दुपारचे!!!"

शेवटी जेव्हा कार्यक्रम पुन्हा चालू झाला तेव्हा एक मालिका चालू झाली होती..... भारती आचरेकर आणि अमोल पालेकरची "आ बैल मुझे मार". ती आम्ही पाहिलेली टीव्हीवरची सर्वात पहिली मालिका. नंतरच्या काळात बुनियाद, हमलोग, कहॉं गये वो लोग, मृगनयनी, रामायण, विक्रम वेताळ, अडोस पडोस, मिस्टर ऍन्ड मिसेस, वाह जनाब, हीरा पन्ना, एक कहानी, कथासागर, नुक्कड, ये जो है जिन्दगी, तलाश, एक दो तीन चार, फूल खिले गुलशन गुलशन, मुंगेरीलाल के हसीन सपने, मुल्ला नसीरूद्दीन अशा एक ना अनेक दर्जेदार मालिका टीव्हीवर आल्या.
काळ बदलू लागला. १९९०ला मी सातवीत असताना मागच्या बाकावर बसणारा 'भिड्या' म्हणाला, तुमच्याकडे झी टीव्ही दिसतो का रे?" उत्तर अर्थात नकारार्थीच होतं परंतु झी टीव्ही म्हणजे काय प्रकार आहे हे कुतुहूलही मनात जागं झालं. नंतर वाटलं हे कुठलंतरी विदेशी चॅनल असावं आणि त्यावर काहीतरी 'मसालेदार' दाखवत असणार. पण हळूहळू हा गैरसमज दूर झाला आणि.... ते म्हणतात ना.... "घरोघरी फॅशनेबल पोरी".... किंवा "घरोघरी मातीच्या चुली"... की काय ते, तसं काहीसं होत गेलं. मुंबईचं शांघाई होण्याच्या नुसत्या घोषणाच होत राहिल्या..... पण घराघराचं थिएटर केंव्हा होऊन गेलं कळालंसुद्धा नाही.
जसजशी ह्या थिएटर संस्कृतीची मुळं खोलवर रुजू लागली तसतसे त्यावरून प्रसारित होणा-या कार्यक्रमांतही बदल झाले. टीव्ही चोवीस तास चालू झाला. स्पर्धा वाढली. भीक नको पण कुत्रा आवर असं म्हणायची वेळ आता आली आहे. दिवसभर ही कुत्री पिसाळल्यासारखी भुंकत असतात. त्यांना प्रतिसाद देणारे प्रेक्षकही काही कमी नाहीत. "एकता"ने चावल्यामुळे अनेकांना "सिरीयलोफिलीया ऑफ सासबहू"ची लागण झाल्याचे आपण घराघरातूंन पाहतो. आणि हे लोक बघतात तरी काय असे झपाटल्यासारखे, तर.... कुणाची भांडणे आणि कुणाची लफडी. बारा गावचे बत्तीस तमाशे ह्या ना त्या चॅनलवर अहोरात्र आपला फड उभारून असतात. आणि नवल म्हणजे वर्षानुवर्षे ह्यांचं तुणतुणं वाजतच असतं. मागे बुनियादमधले मास्टरजी (आलोक नाथ) आणि लाजोजी (अनिता कंवर) ,मालिका जरी लांबलचक असली तरी वर्षभराच्या अंतराने वयस्क होत गेलेले पाहिले होते. दोनएक वर्षांत त्यांना वृद्धावस्था आली होती. पण आता काय अवस्था झाली आहे..... आमच्या अंगणात लावलेल्या औदुंबराच्या रोपटयाचे झाड झाले आणि त्याला उंबर लागू लागले आहेत पण ही टीव्हीवरची "तुळशी" म्हातारी होण्याचे काही नाव नाही. कैलास पर्वतावरची पार्वतीदेवी शंकराजवळ हट्ट करत असेल..... मला त्या टीव्हीवरची "पार्वती" लावते तो शाम्पू आणून द्या म्हणून!!!!! ते बजाज आणि प्रेरणा बहुतेक मी म्हातारा होईपर्यंत भांडणार आहेत अशी मला शंका आहे. ती मंदिरा आणि पायल कारस्थानं करायचं काही सोडणार नाहीत..... माकडं म्हातारी झाली तरी कोलांट्या मारायचं जसं सोडत नाहीत त्यातलाच हा प्रकार. कहर म्हणजे फक्त हिंदी नाही, तर मराठी वाहिन्यांवरही ह्यांचा सुळसुळाट झाला आहे. गाजरगवताच्या बिया एकदा शेतात पडल्या की सगळीकडे हे तण पसरल्याशिवाय राहत नाही. मराठी वाहिनीवरच्या सासूचे चार दिवस आहेत असं मला मुळीच वाटत नाही. निदान चौदा वर्षेतरी हा सासुरवास आपल्याला भोगावा लागण्याची चिन्हे दिसताहेत. अहो तुम्ही उच्छाद मांडला नव्हता त्यामुळेच तर आमची घरं "गोजिरवाणी" होती..... आता तुम्ही आमच्या घरात "गोचिडावाणी" चिटकून बसला आहात. आता एक तर आमचं "भाग्य" नाहीतर आमचा "विधाता" ह्यांचाच काय तो आधार राहणार आहे. आम्ही उगाचच तुमच्या वरलिया रंगाला भुललो आणि "या... सुखांनो या" म्हणालो.... आणि तुम्ही आता ठाण मांडूनच बसलात ना आमच्या घरात.... दिवाळसणाला म्हणून येऊन, हलायचे नाव न घेणा-या जावयासारखे!!!

रोजरोजचे हे प्रकार पाहून, राहून राहून मला सारखी माझ्या मित्राची आठवण येते, जो मला कॉलेजला असताना ते ब्रम्हवचन सांगून गेला.....

"येड्यांच्या बाजारात पेड्यांचा पाऊस"....

दुसरं काय.....?

1 Comments:

Blogger Aarti Badamikar said...

nice writings :)
you should write more...

3:54 AM  

Post a Comment

<< Home